अनधिकृत बांधकामे करत अतिक्रमण करणाऱ्या मुंबईकरांकडून यंदाही चक्क अनधिकृत मंडपात गणरायांना विराजमान केले जात आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवांकरता सुमारे दोन हजार मंडळांनी मंडपांसाठी अर्ज केला होता. परंतु, आतापर्यंत केवळ ९३५ मंडळांनाच परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे तब्बल ११०० मंडळांचे मंडप हे अनधिकृत असून या मंडपातच बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक उत्सवांचे समन्वयक असलेले उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत मंडपांच्या परवानगीसाठी २०८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९३५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर २३९ मंडळांच्या मंडपांची परवानगी नाकारण्यात आली आहे. म्हणजेच ९११ मंडळांच्या मंडपांना परवानगी मिळालेली नसून त्या सर्वांचे अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
गणेशोत्सव मंडप जर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जागेवर असेल, तर त्यांची परवानगी बंधनकारक असते. त्यामुळे कुलाबा, फोर्ट आदी भागांमधील १८ मंडळांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या एनओसीअभावी पडून आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक पोलिस स्थानक, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दल यांच्याकडून एनओसी न मिळाल्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आलेली नसल्याचे वाघ्राळकर यांनी सांगितले.
मुंबईतील २३९ मंडळांच्या मंडपांचे परवानगी अर्ज बाद केले असून यामध्ये सर्वाधिक मंडळे ही अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील आहेत. या भागात एकूण ११९ मंडळांचे अर्ज आले असून त्यातील केवळ १५ मंडळांनाच परवानगी दिलेली आहे. मात्र, या भागातील १०० मंडळांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्याखालोखाल दादर, माहीम, धारावी भागातील जी उत्तर विभागातील ४८ मंडळांचे अर्ज बाद झाले आहेत.
हेही वाचा