राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशानुसार दूधाला प्रति लिटर २७ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून 'लुटता कशाला फुटकच न्या' असं म्हणत राज्यभर आंदोलन छेडलं आहे. ३ मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाची राज्य सरकारने अद्याप दखल न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांची उपेक्षा न थांबल्यास थेट मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील सर्व दूध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आंदोलन होऊनही सरकारने दूध उत्पादकांची उपेक्षा केल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवसापासून दूध उत्पादक शेतकरी तहसील कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आमचा तळतळाट सरकारपर्यंत पोहोचवा’ म्हणत फुकट दूध वाटप करणार आहेत.
एवढंच नाही, तर भाजपाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आमंत्रण देऊन तहसील कार्यालयांवर दूध पिण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरावर या काळात ठिकठीकाणी रास्तारोको आंदोलने करण्यात येणार आहेत. इतके करूनही आंदोलनाची दखल न घेतल्यास मुंबई मंत्रालयासमोर धडक देत मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटप आंदोलन करण्यात येणार आहे.
मंत्रालयासमोर होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड आणि नाशिक जिल्ह्यात संघर्ष समितीचा व्यापक दौरा आयोजित करण्यात आहे. राज्यभरातील दूध उत्पादक व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी संपर्क करून या आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे.
- डाॅ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा
हेही वाचा-
'ते' रोखणार मुंबई, ठाण्याचं दूध!
दुधाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं 'फुकट' आंदोलन