गेले काही दिवस मध्य रेल्वे विविध कारणांमुळं सतत विस्कळीत होत असून, प्रवाशांना दररोज लेट मार्कचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं रेल्वेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्यांवर चर्चा करताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे उत्तर ऐकून अमित ठाकरे यांनी चक्क डोक टेकल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळानं रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्यानं निवेदन दिलं.
बैठकीवेळी अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसमोर समस्यांचा पाढा वाचला. तसंच, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही मांडला. त्याचप्रमाणं, महिला सुरक्षित नसल्याचंही त्यांनी निदर्शनास आणलं. त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावे आणि सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करावी, असंही त्यांनी सांगितलं. रेल्वेच्या मेगाब्लॉकवर आणि पावसाळ्यात रेल्वेच्या रखडपट्टीवर उपाय काढावे, रेल्वेच्या संख्यांमध्ये वाढ करावी, असेही त्यांनी नमूद केलं.
पहिल्या दर्जाच्या डब्यामध्ये होणाऱ्या गर्दीवरही त्यांनी लक्ष वेधलं. या डब्यामध्ये एवढी गर्दी होते, तर या अधिक पैसे देऊन काढलेल्या पासचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. रेल्वे सेवांबाबत वेळापत्रकाची नियमितता पाळावी, रेल्वे रद्द करण्याचे प्रमाण कमी करावं, गर्दीच्या स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवाव्यात, महिला प्रवाशांकरिता विशेष गाड्यांचं नियोजन करावं, प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत, रेल्वे स्थानकं आणि पादचारी पुलांवर गर्दीचं नियंत्रण आणि सुचना देण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावे, अशा अनेक सुचना मनसेने निवेदनाद्वारे केल्या आहेत.
हेही वाचा -
Video: 'सर्वसक्तीसाली' गणेश गायतोंडे परत येतोय… ‘या’ तारखेला
राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी