
या पुनर्विकासाचा केंद्रबिंदू पवई तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस असलेला आदी शंकराचार्य मार्गालगतचा परिसर असेल. यासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याकरिता महापालिकेने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 1.75 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पवई तलाव हे मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. विशेषतः पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच गणेशोत्सव काळात तलाव परिसरातील घाटांवर गणेश विसर्जनाची परंपरा असल्याने या भागाला सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
तलावाच्या दक्षिण काठावर गणेश घाट आणि पवारवाडी विसर्जन घाट यांना जोडणारा सुमारे 1.75 किलोमीटर लांबीचा प्रोमेनेड (पदपथ) 2008 मध्ये विकसित करण्यात आला होता. मात्र गेल्या 18 वर्षांत या परिसराचे सौंदर्यीकरण किंवा मोठी दुरुस्ती झालेली नाही.
दरम्यान, मेट्रो स्थानकांना जोडणारे जिने आणि एस्कलेटर उभारणे, तसेच तलावात सांडपाणी जाण्यापासून रोखण्यासाठी भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने या पदपथाची अवस्था आणखी खराब झाली आहे.
स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी परिसराच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेने पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्यावर व्यापक पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकल्पांतर्गत तलावालगतच्या महापालिकेच्या जागांचा विकास करण्याची शक्यता तपासली जाणार आहे. तसेच पर्यटकांसाठी आकर्षणे, फूड कोर्ट, विश्रांती सुविधा आणि काही ठिकाणी तिकीट आधारित प्रवेश व्यवस्था उभारण्याचाही विचार सुरू आहे. या माध्यमातून प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल.
जुलै 2025 मध्ये झालेल्या पवई तलाव पुनरुज्जीवन आढावा बैठकीत तलाव किनाऱ्याच्या विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर या प्रस्तावाला गती मिळाली.
सुमारे 223 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र 6.61 चौरस किलोमीटर आहे. तलाव परिसरात विविध प्रकारचे मासे, मगरी तसेच हंगामानुसार स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य असल्याने हा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो.
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, आधुनिक पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण आणि पर्यटकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाल्यास पवई तलाव परिसराचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढेल. यामुळे पर्यावरणपूरक पर्यटन, विरंगुळा आणि निसर्ग संवर्धनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा
