महाराष्ट्रात सध्या हवमानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. कोकणात एकिकडे तापमानाचा उच्चांकी आकडा गाठला आहे. निफाडमध्ये मात्र रात्रीच्या वेळीचा आकडा 4 ते 5 अंशांच्या दरम्यान घसरल्याची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिेलेल्या पूर्वसुचनेनुसार राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रांमध्ये उष्मा वाढला आहे. मागील 24 तासांत सर्वाधिक तापमानाची नोंद सिंधुदुर्गात करण्यात आली आहे. इथं पारा 40 अंशांवर गेल्यानं नागरिकांना प्रचंड उष्मा सोसावा लागला.
मुंबईत उन्हाचा तडाखा पुढील 48 तासांत आणखी वाढणार आहे. रविवारी आणि सोमवारी परिस्थिती आणखी भीषण होणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना कडाक्याच्या उन्हात घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या दिशेनं येणाऱ्या वाऱ्यांची दिशा सध्या बदलली आहे. ज्यामध्ये पूर्वेकडून येणारे वारे राज्याच्या किनारपट्टी भागावर सर्वाधिक प्रभाव पाडत आहेत. त्यामुळं तापमानात वाढ होत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
मार्च महिन्यात राज्यात उष्णतेच्या लाटांचा मारा वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागानं यापूर्वीच दिले असून, ही परिस्थिती येत्या दिवसांत आणखी भीषण होणार असल्यानं नागरिकांना आरोग्याचीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा