Advertisement

महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा, सभागृहाची मागणी


महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा, सभागृहाची मागणी
SHARES

मुंबईत सध्या पावसामुळे पूर परिस्थिती, झाडे पडून तसेच मॅनहोल्स आणि गटारांमध्ये पडून दुघर्टना घडत आहेत. रस्ते, इमारती खचल्या जात आहेत. मात्र, इमारत प्रस्ताव विभाग हा खुद्द महापालिका आयुक्तांकडे असतानाही त्यांनी रहिवाशांनी दिलेल्या तक्रारींची दखल घेतलेली नाही. 

निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीलाही महापालिका आयुक्त टाळू शकले नाहीत. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी म्हणून आयुक्त अजोय मेहता यांनी राजीनामा देण्याची मागणी महापालिका सभागृहाने केली आहे.


पालिकेचा निष्काळजीपणा

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं. यामुळे घाण आणि स्वच्छता पसरुन लेप्टोस्पायरेसीसचे आजार पसरत आहेत. आतापर्यंत दोघांचे बळी गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. तर वडाळा येथे दोस्ती एकर्स व लॉईड इस्टेट संकुलाशेजारी बांधकामांमुळे जमीन खचल्याने इमारतींना तडे गेले आहेत. पावसामुळे झाडे पडून लोकांचे जीव जात आहेत. हे सर्व महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच होत असून याचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका सभागृहात निवेदनाद्वारे केला. 


दोस्ती कोणाशी 

दोस्ती बिल्डरची कोणाशी दोस्ती आहे, असा सवाल करत इमारत प्रस्ताव विभाग हा केवळ विकासकांसाठीच काम करत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. त्यामुळे वडाळ्याच्या घटनेप्रकरणी संबंधित अभियंत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच ३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या अधिकाऱ्यांचीही त्वरीत बदली करण्याचीही मागणी त्यांनी केली.

धोकादायक झाडे जाहीर करा 

सपाचे रईस शेख यांनी इमारत प्रस्ताव विभागाचे अभियंते प्रत्यक्ष साईटवर जात नसल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही शेख यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी धोकादायक इमारतींप्रमाणे धोकादायक झाडे जाहीर करावीत. तसेच जे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी केली.


४४० कुटुंब  भीतीच्या छायेखाली

लॉईड इस्टेट इमारतीशेजारील बांधकामाबाबत रहिवाशांनी सहा वेळा तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. इमारत प्रस्ताव विभागाच्या मागील बाजूस ही साईट आहे. तरीही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे या सर्व इमारतीतील ४४० कुटुंब आणि साडेचार हजार माणसे भीतीच्या छायेखाली राहत असल्याचं सांगितलं. त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनिअरविरोधात एफआयआर दाखल करावा आणि इमारत प्रस्ताव विभाग आयुक्तांकडे असल्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक सुफियान वणू यांनी केली.


वृक्ष अधिकाऱ्यावरही कारवाई करा 

दोस्ती दुघर्टनाप्रकरणात विकास आणि अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी साडेपाच नंतरच या विभागाचे कामकाज कुणासाठी चालतं असा सवाल केला. एवढंच नाही झाडं पडल्यास वृक्ष अधिकाऱ्यावरही कारवाई करा नव्हे तर त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,अशीही मागणी केली.


मालमत्तांची चौकशी करा

जोवर अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जात नाही तोवर मुंबईकरांना दिलासा मिळणार नाही, असे सांगत भाजपाचे मनोज कोटक यांनी अशाप्रकारच्या घटनांप्रकरणी सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ,अशी मागणी केली. तसेच इमारत प्रस्ताव विभागातील जे अधिकारी ३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदांवर आहेत, त्यांच्या मालमत्तांची चौकशी केली जावी. 

तसेच ज्या अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन विकासकांची चाकरी करण्यास सुरुवात केली आहे, त्यांच्या मालमत्तांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्यासह तृष्णा विश्वासराव, अश्रफ आझमी आदींनी या चर्चेत भाग घेतला होता.



हेही वाचा -

म्हणून 'त्या' विमानकंपनीला काळ्या यादीत टाकलं

दोस्ती बिल्डर विरोधात 'त्या' रहिवाशांची कोर्टात धाव



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा