मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावासाची संततधार सुरुच आहे. मंगळवारी सुरू झालेल्या पावसानं विश्रांती न घेतल्यानं पादचाऱ्यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसंच, या पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. त्यामुळं प्रवाशांची स्थानकांवर प्रचंड गर्दी जमली आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिरानं सुरू आहे. परंतु, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या वेळेवर सुरू असून, पावसाची रिपरिप सुरुच असल्यानं सखल भागांता पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळं रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
हवामान विभागानं पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच, मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत २ आणि ३ तारखेदरम्यान १३१.४ मिमीपावसाची नोंद झाली, तर कुलाबा वेधशाळेत ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस पडत असल्यानं गणेश भक्त नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा -
CSMT स्थानक जगात सर्वात आश्चर्यकारक!