गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह,
पुणे,
कोकण,
विदर्भ,
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असणारा पाऊस अजून आठवडाभर असाच कोसळत राहणार आहे,
असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यात रविवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी ओली ठरणार की काय? या चिंतेत मुंबईकर आहेत.
मुंबई वेधशाळेकडून ८ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामध्ये ईशान्य मान्सून वाऱ्यांनी दक्षिण भारतात पावसाला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक भागात आर्द्रता कमी झालेली नाही. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला आहे. आणि त्यामुळे पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ही स्थिती पुढचा आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीवरही पावसाचे सावट असल्याची शक्यता आहे.