Advertisement

एनडीआरएफची ४ पथकं रत्नागिरी, कोल्हापूरकडे रवाना

रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी २ अशी एकूण ४ पथके रवाना होत आहेत.

एनडीआरएफची ४ पथकं रत्नागिरी, कोल्हापूरकडे रवाना
SHARES

मुसळधार पावसात बचावकार्य करण्यासाठी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी २ अशी एकूण ४ पथके रवाना होत आहेत. तर ठाणे इथं ३ व पालघर इथं एक टीम पोहचली आहे.

रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युद्धपातळीवर काम करत आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, कोयना धरणातून होणाऱ्‍या पाण्याचा विसर्ग व वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड या शहराला पुराच्या पाण्याने वेढलं आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या भागातील मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम लवकरच पोहोचतील यासाठी आपत्ती व्यवस्थापन  विभाग प्रयत्नशील आहे. तसंच जिल्हाधिकारी यांनी कोस्टगार्ड व वायुदलाचीही मागणी केली आहे.

हेही वाचा- रायगड, रत्नागिरीतील नद्यांना धोक्यांची पातळी ओलांडली

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले, रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झालेला आहे. तेथील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे शाहुवाडी व गगनबावडा तालुक्यातील काही परिसर जलमय झालेला आहे. सिंधुदुर्गला गगनबावड्यामार्गे होणारी वाहतूक थांबवली आहे. 

स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.या भागातही एनडीआरएफची २ पथकं मदतीसाठी रवाना झाली आहेत. ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण व भिंवडीच्या काही परिसरात पाणी साचलं आहे. या भागात मदतीसाठी एनडीआरएफची ३ पथकं मदतीसाठी पोहचली आहेत. या भागातही पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मुंबईत एनडीआरएफच्या २ टीम असून एक टीम नागपूरमध्ये, तर ७ टीम पुणे इथं आहेत. जिल्ह्यामधील सर्व यंत्रणांकडून नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा