राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन पुन्हा लागू करायची की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावर सरसकट लॉकडाऊन नको त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली. तसेच राज्यातच रुग्ण जास्त कसे, अशी शंकाही या वेळी उपस्थित करण्यात आली.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोणते उपाय योजायचे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्ण असलेल्या काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन लागू करायची का, यावर बराच खल झाला. राज्यात सध्या सरासरी २५ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. हा कल असाच राहिल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. लॉकडाऊनऐवजी सध्या लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात यावे, अशी सूचना मंत्र्यांकडून करण्यात आली.
यापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनुभव फारसा चांगला नाही. तसेच त्यातून आर्थिक गाडी रुळावरून घसरते. यामुळे लॉकडाऊनचा सध्या तरी विचार होऊ नये, असेच सर्वांचे मत झाले. अगदीच शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करता येईल.
निर्बंध अधिक कठोर करण्याचे संकेत देण्यात आले. यानुसार गर्दी टाळण्याकरिता काही कठोर उपाय योजण्यात येणार आहेत. मुंबई, ठाण्यात रेल्वे प्रवासासाठी वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. यानुसार सर्वसामान्य प्रवाशांना दुपारी १२ नंतर आणि रात्री ९ नंतरच प्रवास करता येईल. हॉटेल्स, बार रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवता येणार नाहीत. व्यायामशाळा, तरण तलाव आदींवर निर्बंध लागू केलं जाणार आहेत. होळीच्या सुट्टीच्या वेळी पर्यटनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून कठोर उपाय योजले जाणार आहेत.
हेही वाचा -