मुंबईसह राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं या आगोदरच स्पष्ट करण्यात आलं आहे. या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिकेनं सतर्क राहण्याचा निर्णय घेतला. सध्या राज्यात गणेशोत्सव सुरू असून, यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाच सावट आहे. अशातच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्याही वाढते. राज्यात रविवारी दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ६४ लाख ९७ हजार ८७७ झाली आहे.
रविवारी दिवसभरात २ हजार ९७२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत राज्यात ६३ लाख ५ हजार ७८८ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत तर, सध्या राज्यभरात सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४०० इतकी आहे. राज्यात दिवसभरात ४६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१२ टक्के एवढा आहे. तर, आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार १४२ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५९ लाख ७९ हजार ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर, सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २०७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, १ हजार ८९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.