१ मेपासून १८ वर्षांपुढील तरुणांचं लसीकरण सुरू होणार आहे. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळं पुढील टप्प्यातील लसीकरण मोहिमेच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. मुंबईत १ एप्रिल रोजी सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाल्यानंतर पुढील अवघ्या १५ दिवसांतच पुन्हा एकदा लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळं लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईत ४५ वर्षांवरील निम्म्याच नागरिकांचं लसीकरण झालं असून, त्यातही दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांचं प्रमाण जेमतेम ७ टक्के आहे.
लशींचा तुडवडा निर्माण झाल्यामुळं मुंबईतील अनेक केंद्र बंद करण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतर १ एप्रिलला दिवसभरात लस दिलेल्या नागरिकांची संख्या जवळपास ५५ हजार होती. त्यानंतर लसीकरण मोहीम वेग घेत असल्याचं दिसत असतानाच पुन्हा एकदा लशींचा पुरवठा कमी होत असल्यानं मोहीम थंडावली आहे.
मुंबईत ४५ वर्षावरील ४० लाख नागरिक आहेत. त्यापैकी आतापर्यंत २० लाख ४३ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यातील २ लाख ७६ हजार म्हणजेच ६.९ टक्के नागरिकांनाच दुसरी मात्रा मिळाली आहे. मुंबईतील ४९ केंद्रे लस उपलब्ध न झाल्यानं बुधवारी बंद ठेवावी लागली. अनेक नागरिकांना परत पाठवण्याची वेळ व्यवस्थापनावर आली.