पर्यावरणाच्या रक्षणासाठी संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात येणार असल्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने जारी केली आहे. प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेटस्, ताट, वाट्या, चमचे, कप, ग्लास, बॅनर्स, तोरण, ध्वज आदी सर्व प्रकारचे प्लास्टिक वेस्टनाचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास संपूर्ण राज्यात बंदी घालण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लवकरच प्लास्टिकला कायमचंच टाटा बाय-बाय केलं जाणार यात शंका नाही.
प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकची इतर उत्पादने ही नैसर्गिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने, त्याच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. जल नि:सारणास अवरोध निर्माण होऊन, पाणी तुंबते आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिकचा संपूर्णपणे वापर थांबावा, निर्मिती थांबावी म्हणून लवकरच शासनातर्फे बंदी घालण्याचे प्रयोजन आहे.
प्लास्टिक आणि थर्माकॉलच्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी संबधित नगरपालिका, महापालिका, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित करण्यात आलं आहे. तसेच मॉल्स, दुकानदार, मोठे व्यापारी, भाजी विक्रेते, हॉटेल्स व्यावसायिक यांनीही प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही पर्यावरण विभागाने केले आहे. दुकाने, आस्थापना, मॉल्स यांना परवाने देणाऱ्या प्राधिकरण अथवा निरीक्षकांनी अशा आस्थापनांचे नुतनीकरणाच्या वेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असंही पर्यावरण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.