विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021
तसंच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत आणि गंभीर जखमींना १ लाखाची मदत जाहीर केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असंही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना जीव गमवावा लागला आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. एसीचा स्फोट झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असं राजेश टोपेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा