Advertisement

विरार हॉस्पिटमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

विरार हॉस्पिटमधील दुर्घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
SHARES

विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूनं महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितलं,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करत दिली आहे.

“उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीनं योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. “विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्यानं मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना जीव गमवावा लागला आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. एसीचा स्फोट झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असं राजेश टोपेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

दरम्यान नुकतंच नाशिकमध्ये ऑक्सिजन टँक लिकेज झाला होता. या दुर्घटनेत ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला. आता विरार आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 



हेही वाचा

विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा