महापालिकेची बेस्ट बससेवा म्हणजे मुंबईतील कुठल्याही कानाकोप-यात प्रवास करण्याचा 'बेस्ट' पर्याय. या बेस्टची प्रवाशीसंख्या जशी मोठी. तशाच प्रवाशांच्या समस्या आणि अडचणीही अधिक. त्यामुळंच बेस्टची प्रवासी संख्या रोडावत चाललीय. परिणामी बेस्टच्या उत्पन्नातही घट होतेय. यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनानं एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. त्यानुसार बेस्टचे वरिष्ठ अधिकारी प्रवाशांची थेट भेट घेणार आहेत.
4 सप्टेंबरला शहर विभागातील कुलाबा, बॅकबे, सेंट्रल, वरळी, वडाळा आणि वांद्रे या आगारांमधून या उपक्रमाला सुरुवात होईल. या आगारांचे आगार व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी सकाळी 11 वाजता थेट आगार गाठतील आणि प्रवाशांसोबत थेट संवाद साधतील. यावेळी प्रवाशांच्या समस्या, अडचणी ऐकून घेण्यात येतील. तसंच सेवेत सुधारणा करण्यासाठी प्रवाशांकडून सूचनाही मागवण्यात येतील.