रस्ता समजून एक कार थेट नदीत घुसल्याची धक्कादायक घटना सोमवारी पनवेलमध्ये घडली. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून गाडीतील कुटुंबाला गावकऱ्यांनी सुरक्षितरित्या दोरखंदाच्या सहाय्यानं वाचवलं.
पनवेल तालुक्यातील तळोजा गावात राहणारे अश्रफ शेख त्यांची पत्नी हमीदा आणि मुलगी सुहाना आणि भावाची मुलगी रुक्साना काही कामासंदर्भात सोमवारी दुपारच्या सुमारास कारमधून बाहेर जात होते. त्यावेळी प्रवास करत असताना घोटी नदीच्या पुलाला कठडा नसल्यानं अश्रफ यांना त्या पुलाचा अंदाज आला नाही आणि त्यांची गाडी थेट नदीत कोसळली. मात्र, या परिसरातील गावकऱ्यांनी तातडीनं जेसीबी आणि दोरखंडाच्या सहाय्यानं गाडीतील चार जणांना सुखरुप बाहेर काढलं.
मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं सर्व नद्या, धरणं, तलाव दुतडीभरून वाहत आहेत. काही नद्यांमध्ये पुरस्तिथी निर्माण झाल्यामुळं काही गावांचा सपर्कही तुटला आहे.