गोवंडी - दूषित पाणीपुरवठ्याला कंटाळून शुक्रवारी टाटानगरमधील रहिवासी नगरसेवक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला बसले. गेल्या तीन महिन्यापासून या परिसरात नळाला दूषित पाणी येत होतं. या पाण्यामुळे कावीळसारखे आजार बळावले होते. याबाबत अनेकदा पालिकेला पत्रव्यवहार करूनही याकडं दुर्लक्ष केलं जात होतं असा आरोप इथल्या रहिवाशांनी केला. त्यामुळे रहिवाशांनी टोकाचं पाऊल उचललं. तसंच जोपर्यंत नळाला स्वच्छ पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.