महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच कोरोनाव्हायरसच्या दृष्टीनं ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं. तथापि, अनलॉक 5.0 अंतर्गत बर्याच क्षेत्रांना लॉकडाऊनमध्ये अंशत: शिथिलता दिली आहे. त्यामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा खुली करण्यास परवानगी दिली आहे.
परंतु, त्याचवेळी त्यांना लॉकडाऊन नियमांचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालिकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये फक्त ५० टक्के ग्राहकांना आत बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसंच हॉटेलच्या आवारात गर्दी होता कामा नये.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हॉटेलवाल्यांना पार्सलला अधिक प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. तथापि, आता हॉटेल आणि रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र सर्वच रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स पुन्हा सुरू झाली नाहीत. कारण हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे बरेचसे कर्मचारी मुंबईच्या बाहेर किंवा त्यांच्या गावाला गेले आहेत. ज्यामुळे हॉटेल्समध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.
याबाबत इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, “अपेक्षेनुसार ३० ते ३५ टक्के रेस्टॉरंट्स उघडली आहेत. त्यापैकी बहुतेक मर्यादित मेनूमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी फक्त ३० ते ४० टक्के कर्मचारी हजर आहेत.
शेट्टी म्हणाले, आम्हाला आशा आहे की १५ दिवसांत परिस्थिती पुन्हा सामान्य होईल. रेस्टॉरंटचे मालकांनी नियमांचं पालन करणार असं सुनिश्चित केलं आहे. ते पुढे म्हणाले की, शरीराचे तापमान तपासणी, सामाजिक अंतर, मास्क घालणं, ग्राहकांशी थेट संपर्क न साधणं यासह इतर नियम आणि SOP बनवण्याबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभारी आहोत.
हेही वाचा