राज्य सरकारच्या लॉकडाउनच्या चर्चेने मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईभर असलेल्या लाखो किरकोळ विक्रेत्यांचे हातावर पोट असून, रोजच्या कमाईवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आता लॉकडाउन लागला तर करायचे काय या भीतीने त्यांना ग्रासलेले आहे.
मुंबईतील बाजारपेठेत हे विक्रेते लहान-मोठ्या वस्तूंची विक्री करीत असतात. त्यामध्ये रुमालापासून ते मोजे, मोबाइल कव्हर, सौंदर्य प्रसाधने तसेच खाण्याच्या लहान-मोठ्या स्टॉल्सचादेखील समावेश आहे. या सर्वांचा आकडा किमान १ ते दीड लाखाच्या घरात आहे. मागील लॉकडाउनवेळी आधीच्या बचतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. ती सर्व बचत लॉकडाउन काळात संपली. मागील ऑक्टोबरनंतर नव्याने कसाबसा व्यवसाय सुरू केला.
आता जुने नुकसान भरून काढत नव्याने बचत करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल. या स्थितीत जर पुन्हा लॉकडाउन लागले तर कोसळून जाऊ. कुटुंबे उघड्यावर येतील. मुंबई शहर व उपनगरात दीड लाख असे लहान-मोठे विक्रेते आहेत. या दीड लाख विक्रेत्यांवर किमान ६ ते ८ लाख नागरिक अवलंबून आहेत. इतके आठ लाख नागरिक लॉकडाउन लागल्यास रस्त्यावर येऊन उपासमारीची भीती आहे.
असंघटित किरकोळ क्षेत्राची सर्वांत मोठी बाजारपेठ मुंबईत आहे. त्यापाठोपाठ दिल्लीत आहे. यासंबंधी रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया (आरएआय) ही संस्था सर्वेक्षण करीत असते. 'आरएआय'च्या सर्वेक्षणानुसार मागील लॉकडाउनदरम्यान या क्षेत्रातील ९५ टक्के दुकाने बंद होती. नुकसान भरून निघण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. तर ८० टक्के किरकोळ विक्रेत्यांना इतक्यात नफा होईल, अशी कुठलीही चिन्हे नाहीत. अशात लॉकडाउन लागल्यास भीषण स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
हेही वाचा -