Advertisement

बदलत्या हवामानामुळं स्वेटरच्या विक्रीत घट


बदलत्या हवामानामुळं स्वेटरच्या विक्रीत घट
SHARES

दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपासून मुंबईकरांना थंडीची चाहूल लागते. थंडी च्या दिवसात गरम कपडे घालण्याचा कल असतो. त्यासाठी बाजारात स्वेटर घेण्यासाठी आणि गरम व उबदार कपडे घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, यंदा नोव्हेंबर महिना संपत आला तरी स्वेटरच्या विक्रेत्यांनी मुंबईत हजेरी लावलेली नाही. तसंच, मुंबईतल्या बाजारांमधील स्वेटर, शाल, कानटोप्या विक्रेत्यांना सध्या सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळाचा फटका बसत आहे.

'ऐन नोव्हेंबर महिन्यात उन्हाच्या झळा मुंबईकरांना बसत आहेत, जणू मे महिनाच सुरू आहे', असं मत मुंबईकर व्यक्त करत आहेत. तसंच, ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळं माल विकण्याला मर्यादा आणण्यात आली आहे. अशातचं ग्राहक देखील उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी फिरकत नसल्यानं या व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

थंडीची चाहूल लागताच उबदार कपडे घेऊन ईशान्य भारतातून व्यापारी मुंबईत येतात. मुंबईच्या चर्चगेटपासून ते विरापर्यंत आणि सीएसएमटीपासून ते कल्याणपर्यंत सर्व ठिकाणी हे व्यापारी मुख्य बाजारपेठेत अथवा स्थानकांबाहेर उबदार कपड्यांची विक्री करताना पाहायाला मिळतात. मात्र यंदा त्यांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचं चित्र दिसत आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत येणारे हे व्यापारी नोव्हेंबर उजाडला तरी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले नाहीत.

सध्या मुंबईतील काही प्रमुख ठिकाणी या व्यापाऱ्यांनी विक्री सुरू आहे. मात्र, त्यांचीही संख्या फारच कमी आहे. त्याशिवाय, ऑक्टोबरअखेर ते फेब्रुवारी या ४ महिन्यांमध्ये व्यापारी उबदार कपड्यांची विक्री करतात. तसंच, वेळेत मुंबईकरांना थंडीची चाहुल लागत असल्यानं धंदा होतो. पंरतु, या विक्रेत्यांना यंदा 'आपला माल विकला जाणार का?' हा प्रश्न सतावत आहे. त्याचप्रमाणं, थंडीचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण फिरण्यासाठी जाताना गरम कपडे घेऊन जातात. परंतु, यंदा त्यांनीही तारखा पुढे ढकलल्यानं विक्रेत्यांची गैर सोय होत आहे.

महाराष्ट्रातील बदलेल्या वातावरणाचा सगळ्यांनाच फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. त्यामुळं झालेलं हे आर्थिक नुकसान भरून काढणं कठीण आहे. त्यामुळं आता शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची प्रशासनाकडं मागणी करत आहेत. तसंच, उन्हाचा तडाखा पाहून ग्राहक उबदार कपड्यांकडं फिरकतही नाही आहेत. या परिस्थितीत व्यवसाय करणं शक्य नसल्याचं म्हणत विक्रेते नाराजी व्यक्त करत आहेत.

नोव्हेंबर महिना संपत आल्यानं मुंबईत असलेल्या विक्रेत्यांनीही स्वेटर, शाल, कानटोप्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळं स्वेटर, शाल, कानटोप्यांच्या खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यंदा स्वेटरमध्ये स्वेटशर्ट हुडी, झिपर, कार्डिगन, लोकरीचं स्वेटर, यांसारखे विविध प्रकार बाजारात आले असून यांची किंमत ३०० ते ५०० पर्यंत आहे. त्याशिवाय बाजारात मंकी कॅप, लोकरीची कानटोपी, पॉप-पॉम हॅट, रिब-नाईट हॅट, यांसारखे विविध कानटोपीचे प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. या कानटोपीची किंमत १५० रूपये आहेत.



हेही वाचा -

नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम

पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी मॉलकडे वाहनतळाची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा