मुंबईत अनेक पूल धोकादायक असून, त्याची दुरूस्ती केली जात आहे. अशातच आता मुंबईकर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महापालिका पुलाच्या धोक्याचा अलर्ट देणारा सेन्सर बसवणार आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ब्रीजच्या सांध्यांवर हा सेन्सर बसवण्यात येणार आहे. पुलाला कुठलाही प्रकारचा धोका असल्यास प्रशासनाला हा अलर्ट जाणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून बोरिवली कोरा केंद्र, तेली गल्ली अंधेरी असे मोठे ब्रीज अंतिम टप्प्यात असून ते पावसाळ्याआधी प्रवाशांच्या सेवेत येतील असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये माझगाव येथील महत्त्वाचा हँकॉक ब्रीजदेखील मे महिन्याच्या अखेरीस प्रवाशांच्या सेवेत येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यामध्ये हँकॉक ब्रीजवरल येण्या-जाण्यासाठी एक लेन सुरू होणार आहे.
अंधेरीत ३ जुलै २०१८ रोजी गोखले पूल कोसळून २ जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७ जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत.
या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट दर सहा महिन्यांनी करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. तर आता पुलांच्या धोक्याचा अलर्ट देणारा सेंसर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रीज