कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबईचे डबेवाले आळंदीला निघाले आहेत. त्यामुळे द्वादशीला (बारस) म्हणजेच मंगळवार ४ डिसेंबरला मुंबई डबेवाल्यांची सेवा एक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना घरच्या जेवणास मुकावं लागून शकतं.
कार्तिकी एकादशीनिमित्त मुंबई डबेवाले सोमवारचं काम संपवून सायंकाळी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र आळंदी इथं पोहोचणार आहेत. मुंबईतील डबेवाले हे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील असून बरेचजण माऊलींचे भक्त आहेत.
एकादशीनिमित्त आळंदीला गेल्यानंतर मंगळवारी बारस सोडल्यानंतरच ते मुंबईला परतणार आहेत. त्यामुळे मंगळवारी मुंबईच्या चाकरमान्यांना डबा पोहोचवण्याची सेवा मिळणार नाही. एकतर त्यांना आपला डबा सोबत आणावा लागेल किंवा खानावळ किंवा कँटीनचा सहारा घ्यावा लागणार आहे. मात्र, बुधवारी नियमितपणे डबेवाले आपली सेवा देण्यासाठी तत्पर असतील, अशी माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके आणि रामदास करवंदे यांनी दिली.
डबेवाले सोमवारी डबा पोहोचवण्याचं काम आटोपून आळंदी दर्शनाला निघणार आहेत. एकादशीनिमित्ताने डबेवाल्यांचा असणारा उपवासही आळंदीलाच मंगळवारी बारसदिनी सोडला जाणार आहे. डबेवाल्यांची धार्मिक भावना समजून घेत मुंबईकर एका दिवसासाठी डबेवाल्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा मुंबई जेवण डबेवाला संघटनेचे विलास शिंदे यांनी व्यक्त केली. मात्र, बुधवारी ५ तारखेला डबेवाले आपल्या रोजच्या कामाला रुजू होतील, असंही शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा-
मराठा आरक्षणाचे मुंबईच्या डबेवाल्यांकडून गुलाल उधळून स्वागत
मुंबईचे डबेवालेही जाणार अयोध्येला, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा