यंदाच्या मकर संक्रांतीवर कोरोना सोबतच महागाईचंही सावट आहे. साखर, तीळ आणि गुळाचे भाव लॉकडाऊननंतर वाढले आहेत. परिणामी चिक्की व लाडू यांचे भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमी प्रमाणात केली होती. त्यात वाहतूक खर्चही काही प्रमाणात वाढला आहे.
पेट्रोल व डिझेलनं शंभरीच्या जवळ मजल मारल्यानं या सर्वांचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. कोरोना व त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं यंदा बाजारात तीळ आणि गुळाची आवकही कमी झाली. त्यामुळं ऐन संक्रांतीच्या तोंडावर तीळ, गूळ आणि साखरेचे भाव ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत.
तिळ, गुळ आणि साखर भाव
मकर संक्रांतीमध्ये बनवण्यात येणार्या गोड पदार्थांमध्ये तीळ आवर्जून वापरला जातो. लॉकडाऊनच्या आधी १८० रुपये किलो असणारे तीळ मकरसंक्रांतीच्या तोंडावर २०० रुपये किलो झाले आहेत.
लॉकडाऊन व त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे उसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे किरकोळ बाजारात गुळाचा भाव काही प्रमाणात वाढला. लॉकडाऊनआधी ६० रुपये किलो असणारा गूळ लॉकडाऊननंतर ७० रुपये किलो इतका झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर डिझेलचे दर वाढल्यामुळे मुंबईत येणारी साखर काही प्रमाणात महागली. लॉकडाऊनआधी ३४ रुपये किलो असणारी साखर लॉकडाऊननंतर ३८ रुपये किलो झाली आहे.