यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी मोठी उत्सुकता दाखवली आहे. मुंबई पोलिस दलातील १६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांनी यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ५०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हे १६ हजार पोलिस कर्मचाऱ्यांची मतं कुणाचं भाग्य उजाळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मुंबई पोलिस दलाचं मनुष्यबळ ५३ हजार इतकं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेकदा बंदोबस्तामुळे मुंबईबाहेर राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पोलिसांना मतदान करण्यासाठी काही तासांची सूट दिली जाते. तरीही ज्या पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, अशा पोलिसांकडून टपाली मतदानाचे फाॅर्म-१२ भरून घेतले जातात. पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यातच मतदानाचे फाॅर्म-१२ उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात येते.
अनेकदा ड्युटी करून कंटाळलेले पोलिस कर्मचारी टपाली मतदानासाठी फारसे उत्सुक नसतात. २०१४ च्या निवडणुकीत फक्त ५०० जणांनी या टपाली मतदानाचा वापर केला होता. त्यामुळे यंदाही पोलिस कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र टपाली मतदानाकरीता आलेले अर्ज बघून ही शक्यता धुसर झाली आहे. आतापर्यंत १६ हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. हे सिलबंद फाॅर्म त्या त्या मतदार संघात पाठवले जातील. या मतांची स्वतंत्र मोजणी होईल.
हेही वाचा-
७, ६८५ सराईतांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
निवडणूक काळात गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली, बाँडची रक्कम वाढवली