घोडबंदर येथील कापूरबावडी उड्डाणपूल देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आल्याने बुधवारी सकाळी घोडबंदर मार्गावर परिणाम झाला. कापूरबावडी ते पातलीपाडापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक विरुद्ध दिशेने वाहने चालवू लागले.
मुंबई नाशिक महामार्ग, ढोकळी-हायलँड रोडवरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वाहतूककोंडीसह वाहनचालकांना उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी उशिरा घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
घोडबंदर मार्गे दररोज हजारो वाहने ठाणे, भिवंडी, नाशिक आणि मुंबईकडे जातात. कापूरबावडी विमानतळ पुलावरून अवजड वाहने जातात. या उड्डाणपुलावरील रस्त्याला जोडणारी लोखंडी पट्टी बदलण्याचे काम मंगळवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळीही पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.
हजारो कामगार घोडबंदर येथून ठाणे, मुंबई, भिवंडीच्या दिशेने प्रवास करतात. मात्र या वाहनचालकांना वाहतुकीत अडकून पडावे लागले. पर्यायी मार्ग म्हणून काही वाहनधारकांनी ढोकळी, हाईलँड मार्गाचा पर्याय निवडला. दुपारनंतर उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. उष्माघात आणि वाहतूक कोंडी अशा दुहेरी समस्येत वाहनधारक अडकले आहेत.
हेही वाचा