Advertisement

ठाण्यातील झाडांना बसवलंय लोखंडी कवच!


ठाण्यातील झाडांना बसवलंय लोखंडी कवच!
SHARES

गेल्या काही वर्षात ठाणे शहराची झपाट्यानं वाढ झाली असून शहरातील सिमेंट-काँक्रिटकरणाचा मोठा फटका पर्यावरणाला बसला आहे. काँक्रिटकरणामुळं झाडांची मुळं कमजोर झाल्याने झाडं उन्मळून पडताहेत. अशा कमजोर झाडांना लवकरच नवसंजीवनी मिळणार आहे. कारण ठाणे महापालिकेनं ठाण्यातील सर्व झाडांभोवती संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे.


कुठे बसवल्या जाळ्या?

ठाण्यातील एका रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर अशा लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या या कामाचं ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी कौतुक केलं असून ठाण्याप्रमाणेच आता मुंबईतील झाडांनाही अशा जाळ्या बसवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.


हरित लवादाचे आदेश

ठाण्यातील झाडांची बेसुमार कत्तल आणि झाडं कोसळण्याच्या घटनांची दखल घेत २०१५मध्य् राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल झाली होती. त्यानुसार लवादानं प्रत्येक झाडांभोवती १ बाय १ चं आळं तयार करण्याचे, झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिटीकरण करण्याचे तसंच झाडांची कमजोर मुळं काढून टाकण्याचेही आदेश महापालिकेला दिले होते.



अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

पण, या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यातच गेल्या वर्षी पावसाळ्यात अॅड. किशोर पवार यांच्या अंगावर झाड कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जोशी यांनी ठाण्यात जनआंदोलन सुरू केलं नि दुसरीकडे उच्च न्यायालयात जनहीत याचिकाही दाखल केली.


समितीची स्थापना

या सर्व घडामोडींची दखल घेत आॅक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेनं एक समिती स्थापन करून झाडांचा अभ्यास, तपासणी करत काय उपाययोजना करता येतील त्याचा सविस्तर अहवाल तयार केला. त्यानुसार मार्च २०१८ मध्ये कोण काय काम करणार? याची जबाबदारीही निश्चित केली. त्याचबरोबर झाडांभोवती लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला.


पाठपुराव्याला यश

परंतु या निर्णयाचीही अंमलबजावणी महापालिकेकडून होत नव्हती. शेवटी जोशी यांनी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून महापालिकेनं ठाण्यातील एका रस्त्यावर झाडाभोवती लोखंडी संरक्षण जाळ्या बसवण्यात सुरूवात केल्याचं जोशी यांनी सांगितलं.

या जाळ्यामुळे सिमेंट-काँक्रिटकरणाचा फटका झाडाच्या मुळांंना बसणार नाही. याचप्रमाणे ठाण्यातील सर्व झाडांभोवती अशा जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण करावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली . महत्त्वाचं म्हणजे हा ठाणे पॅटर्न मुंबईतही राबवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून सुरू झाली आहे.



हेही वाचा-

'एमएमआरसी'कडून आरेत बेकायदा बांधकाम? पर्यावरणप्रेमींकडून तक्रारीवर तक्रारी दाखल

महिन्याभरात नवा वृक्ष अधिकारी नेमा! ठाणे महापालिकेला न्यायालयाचा दणका



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा