ठाणे महापालिकेने बाळकुम येथे ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव बांधला आहे. या जलतरण तलावाचे उद्घाटन होऊन दोन वर्षे उलटली, तरी तो अजूनही लोकांसाठी खुला झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
बाळकुम परिसरातील राममारुती नगर येथे ठाणे महापालिकेने 27 कोटी रुपये खर्चून ऑलिम्पिक दर्जाचा धर्मवीर आनंद दिघे जलतरण तलाव बांधला आहे. या जलतरण तलावाचे उद्घाटन दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तरीही हा जलतरण तलाव बंद असून प्रत्यक्षात जलतरण तलावाचा वापर होत नाही.
दिवाळीच्या सुटीत लहान मुले आणि पोहणाऱ्यांसाठी पूल उपलब्ध नसल्याने काही नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आमदार संजय केळकर यांनी बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन हा जलतरण तलाव तत्काळ खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
धरमवीर आनंद दिघे यांचे नाव असलेला हा जलतरण तलाव ठाणे महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित होत आहे. आता पुन्हा कामाच्या निविदा काढण्याचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे हा तलाव कधी खुला होणार, असा सवाल केळकर यांनी अधिकाऱ्यांना केला.
हेही वाचा