Advertisement

मुंबईतील समुद्राचे खारे पाणी गोडे होणार

मुंबईची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

मुंबईतील समुद्राचे खारे पाणी गोडे होणार
SHARES

मुंबईची (mumbai) लोकसंख्या वाढत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे वापराच्या पाण्याची म्हणजेच गोड्या पाण्याची पाण्याची मागणीही वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प (water Desalination plant) उभारला जाणार आहे.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी महापालिकेने (bmc) नुकतीच निविदा काढली आहे. या प्रकल्पासाठी चार हजार चारशे कोटी रुपये खर्च येणार आहे. गेली तीन-चार वर्षे प्रकल्प सुरू होण्याआधीच रखडल्याने, त्याच्या किंमतीत जवळपास एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून होतो. मुंबईची वाढती पाण्याची गरज (water supply) भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला. निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू करून मुंबई महापालिकेने निविदा काढली आहे.

या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर (sea water) प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज 200 दशलक्ष लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात 200 दशलक्ष लिटर असे एकूण 400 दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे.

आधी या प्रकल्पासाठी तीन हजार 520 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता हा खर्च साधारण एक हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. प्रकल्पाचे आरेखन व बांधकामाचा खर्च तीन हजार 200 कोटी रुपये आहे.

तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखभाल, दुरुस्तीसाठी 20 वर्षांसाठी 1,200 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक यंत्रणा, साधने परदेशातून आयात केली जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या किंमतीत वाढ झाल्यानेही प्रकल्पखर्चात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी डिसेंबर 2023 पासून निविदाप्रक्रिया सुरू केली होती. मात्र, अनेक तांत्रिक मुद्दे आणि अटी-शर्तींमुळे त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने मुदतवाढ दिली जात होती. निविदा रद्द करून महापालिकेने मध्यंतरी पुनर्निविदा काढण्याचाही निर्णय घेतला, पण पुनर्निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रियाच रद्द केली होती.

'मुंबईत पाणीगळती, चोरीमुळे ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. ते वाचवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. त्यातच गारगाई धरणही होत आहे. मग हजारो कोटींचा निःक्षारीकरण प्रकल्प कशाला हवा? यामुळे निसर्गावरही परिणामाची शक्यता आहे. ही तर महापालिकेकडून उधळपट्टीच होत आहे,' असे पाणी हक्क समितीचे निमंत्रक सीताराम शेलार म्हणाले.

रखडलेल्या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून पुन्हा निविदा मनोरी येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्प पूर्ण होताच पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरिवली पश्चिम, आर उत्तर दहिसर पश्चिम आणि आर दक्षिण कांदिवली पश्चिम या वॉडाँना या प्रकल्पातून पाणी मिळेल.

सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यन्वित होताच, भांडुप संकुलातील या पाच वॉडांच्या वाट्याचे पाणी शिल्लक राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अक्षय्य ऊर्जेचा वापर करणारा मुंबईतील हा पहिलाच प्रकल्प असेल.



हेही वाचा

मुंबईत पिंक वुमन आर्मी करणार स्वच्छता

विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीस खुला होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा