शनिवारी पावसानं मुंबईत एंट्री घेताच ३ जणांचे बळीही घेतले. त्यानंतर सोमवारी रात्री ८ वाजता पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावताच करी रोड, सायन, चर्नीरोड, महालक्ष्मीसह अन्य ठिकाणची बत्तीगुल झाली. इतकंच नव्हे, तर काही रेल्वे स्थानकांवरील वीजही गायब झाली. यामुळे रात्री उशीरा कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे या पावसानं चांगलेच हाल झाले.
हार्बर रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं बेलापूर ते नेरूळ हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी अडचणींचा सामना करावा लागला. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवाही उशीराने धावत आहेत. दरम्यान वसई, विरार, ठाणे, बदलापूर या ठिकाणी सायंकाळपासूनच पावसानं जोर पकडला असून इथं विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. परिणामी वसईसह अन्य भागातील वीजही गायब झाली आहे.
No overhead wire broke. It was an external wire thrown over OHE or flew over OHE which was immediately removed from OHE and traffic normalized within few minutes
— Central Railway (@Central_Railway) June 4, 2018
मुंबई शहरासह उपनगरात जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. याविषयी हवामान खात्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठाणे-कोकण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. परिणामी त्या भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतही जोरदार वारं वाहत आहे. पण हे वादळ नसल्यानं मुंबईकरांनी घाबरू नये, असं आवाहन हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केलं आहे.
मुंबईतील कांजूर मार्ग, अंधेरी रेल्वे स्थानक या स्थानकांवरील वीज गायब झाल्याचं समजत आहे. तर करी रोड, चर्नी रोड, परळ या ठिकाणाही वीज गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पहिल्या-दुसऱ्या पावसातच बत्तीगुल होण्यासह ओव्हर हेड वायर तुटण्याच्या घटना घडत असल्यानं मुंबईतील संबंधित यंत्रणा पावसासाठी किती आणि कशा सज्ज होत्या हेच यावरून समोर येत आहे.
हेही वाचा-
प्रतिक्षानगरच्या रहिवाशांना खड्डेमुक्तीची प्रतिक्षा!