सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी आणि मंगळवारी पहाटे येणाऱ्या भाज्या, फळे वाशीच्या (vashi) एपीएमसी (APMC) बाजारात व्यवस्थितपणे पोहोचू शकली नाहीत.
त्यातच बाजारात जेमतेम पोहोचलेली फळे (fruits) आणि भाज्याही (vegetables) पावसात भिजल्याने मंगळवारी मोठ्या प्रमाणात ती कचऱ्यात फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली अन् त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.
दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईला (mumbai) होणाऱ्या भाज्या, फळांच्या पुरवठ्याला फटका बसला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कमी प्रमाणात भाज्या पोहोचल्या. त्यातच आलेल्या भाज्या आणि फळेही पावसाने भिजली होती. त्यामुळे हा माल बाजारात आल्यावर तो खराब होण्यास सुरुवात झाली.
परिणामी, घाऊक बाजारात मंगळवारी भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रविवारी बाजाराची सुट्टी, तर सोमवारी पावसामुळे अनेक किरकोळ विक्रेते भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात येऊ शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी हे खरेदीदार बाजारात (market) आले होते.
मात्र बाजारात मुबलक प्रमाणात चांगला माल नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. तसेच बाजारात कमी माल होता आणि तोही पावसाच्या पाण्यात भिजलेला.
या पार्श्वभूमीवर भाज्यांचे दर घाऊक बाजारातच वाढले होते. भाज्यांच्या दरात सरासरी 30 ते 35 टक्क्यांची वाढ झाली होती. टोमॅटो 10 ते 20 रुपयांवरून 30 ते 40 रुपये किलोवर पोहोचले होते. पावसाळ्यात फ्लॉवरला पाणी लागले की, ते लगेच कुजण्यास सुरुवात होते.