Advertisement

बटाट्याची भाववाढ; पश्चिम बंगालची निर्यातीवर रोख

पश्चिम बंगालच्या निर्णयामुळे बिहार, झारखंड आणि ओडीशा राज्यातील कांंदा, बटाट्याचे भाव दहा रुपयाने वाढले आहेत.

बटाट्याची भाववाढ; पश्चिम बंगालची निर्यातीवर रोख
SHARES
पश्चिम बंगाल (west bengal) सरकारने बटाटे (potato) आणि कांद्याचे (onion) भाव आवाक्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या सरकारने बटाटा आणि कांद्याच्या निर्यातीवर रोख लावली आहे. पश्चिम बंगालच्या निर्णयामुळे बिहार (bihar), झारखंड आणि ओडीशा राज्यातील कांंदा, बटाट्याचे भाव दहा रुपयाने वाढले आहेत.

तसेच कांदा, बटाट्याच्या भाववाढीचा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला गेला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पश्चिम बंगाल हे उत्तर प्रदेश नंतरचे दुसरे सर्वाधिक बटाटा उत्पादक राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये बटाटा 35 रुपये किलोने तर कांदा 60 रुपये किलोने विकला जात आहे. 

यामुळे पश्चिम बंगाल सरकारने कांदे आणि बटाट्याची राज्याबाहेर विक्री आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालहून बटाट्याची निर्यात प्रामुख्याने ओडीशा (orissa), झारखंड (jharkhand) आणि बिहार येथे होते. 

पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयामुळे तिन्ही राज्यांमध्ये बटाट्याचे दर किलोमागे 10 रुपयांनी वाढून 35-40 रुपये किलो झाले आहेत.

 दुसरीकडे, बटाट्याच्या वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्याच्या मुद्द्याला राजकीय रंग दिला जात आहे. ओडिशातील महागाईसाठी सत्ताधारी भाजपने बंगाल सरकारला जबाबदार धरले आहे. 

झारखंडमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हेमंत सोरेन यांच्या सरकारवर महागाई आणि दरवाढ रोखण्यात असमर्थ असल्याची टीका केली आहे. 

झारखंडमधील हजारीबागचे खासदार मनीष जैस्वाल यांनी लोकसभेत या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. राज्यात बटाट्याचे दर 35 रुपये किलोवर गेले आहेत. राज्यांतर्गत दर कमी करण्यासाठी वाहतूक आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली. असे पश्चिम बंगाल सरकारकडून सांगण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल सरकारने असेही म्हटले आहे की आम्ही झारखंड आणि ओडिशाप्रमाणेच बांगलादेश मध्ये होणाऱ्या बटाट्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे.

महाराष्ट्र राज्यात दररोज आयात होणाऱ्या एकूण बटाट्यापैकी 65  टक्के बटाटा हा उत्तर प्रदेशातून येतो. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेले बटाटे महाराष्ट्रासाठी वर्षभर उपलब्ध असतात. 

बटाट्याचा हंगाम आता संपला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या बटाट्याची काढणी फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल. महाराष्ट्रात, दर्जेदार बटाटा सध्या 35 रुपये ते 40 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

यामुळे मुंबईतील (mumbai) बाजारातही बटाट्याचा भाव गगनाला भिडला आहे. मुंबईत 30 ते 40 रुपये किलोने बटाटा विकला जात आहे. बटाट्याचा हा वाढलेला भाव सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा नाही.



हेही वाचा

मुंबईत 2 वर्षात उभारण्यात येणार बर्ड पार्क

मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा