भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (४८) यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवार रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. बुधवारी दुपारी त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
२ जानेवारीला जीममध्ये व्यायाम करत असतानाच सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड नावाच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचण्यांमध्ये सौरव गांगुलीला हृदय विकार असल्याचं आढळलं. शिवाय त्यांच्या शरीरात गुंतागुंतीचे ३ ब्लाॅकेजेस आढळून आली होती. त्यांच्यावर तातडीने एक अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. तर उर्वरीत अॅन्जिओप्लास्टी तब्येत सुधारल्यानंतर करण्यात येणार होती.
प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याने त्यांना ७ जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत होते. त्यातच पुन्हा एकदा छातीत दुखू लागल्याने त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
गांगुली यांनी कोरोना काळात यूएईत इंडियन प्रीमियर लिगचं यशस्वी आयोजन करून दाखवलं होतं. तेव्हापासून ते सातत्याने धावपळ करत होते.
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुली यांचं नाव घेतलं जातं. गांगुलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत ११३ कसोटी सामने, ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी एकदिवसीय सामन्यात ११,३६३ आणि कसोटीत ७,२१२ धावा केल्या आहेत. शिवाय भारताकडून ४९ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद देखील भूषवलं आहे. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने बरीच यश मिळवलं. १९८३ नंतर टीम इंडियाने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पहिल्यांदाच मजल मारली होती. शिवाय इंग्लंडमध्ये जिंकलेली नेटवेस्ट ट्राॅफी सगळ्यांच्याच लक्षात असेल.