Advertisement

कोरोनाचा 'आयपीएल'ला फटका; संपूर्ण स्पर्धाच रद्द

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आता आयपीएललाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळं आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा 'आयपीएल'ला फटका; संपूर्ण स्पर्धाच रद्द
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आता आयपीएललाही मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळं आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या २ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. शिवाय, चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलनं स्पर्धा रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे. 

हैदराबाद आणि मुंबईमध्ये मंगळवारी दिल्लीत सामना होणार होता. मात्र, खेळाडूंनाही कोरोनचाी लागण होत असल्यानं अखेर बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बायो-बबलमध्येही कोरोनानं घुसखोरी केल्यानं आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र, यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

चेन्नईच्या ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवलं होतं. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत होतं. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या ३ मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाणार होते.

आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. करोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती.

तसंच आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा