गोलंदाजांनी आपलं काम फत्ते केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी विजयाची भक्कम पायाभरणीही केली होती. पण मधल्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे राजस्थान रॉयल्सला महत्त्वाच्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मोठ्या मेहनतीनं बाद फेरीत मजल मारणाऱ्या राजस्थान रॉयल्सचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. कोलकाता नाइट रायडर्सनं २५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. आता शुक्रवारी रंगणाऱ्या क्वालिफायर-२ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ विजेतेपदासाठी चेन्नई सुपर किंग्सशी लढणार आहे.
दिनेश कार्तिकच्या दमदार फलंदाजीमुळे कोलकाता नाइट रायडर्सनं ७ बाद १६९ अशी झेप घेतली होती. हे उद्दिष्ट पेलताना अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करत राजस्थानला विजयासमीप आणून ठेवलं होतं. पण हे दोघंही माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांना कोलकाताला विजय मिळवून देण्यात यश मिळालं नाही. राजस्थानला २० षटकांत ४ बाद १४४ धावाच करता आल्या.
राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर कृष्णाप्पा गौतम याने सुरुवातीलाच दिलेल्या दोन धक्क्यांमुळे घरच्या मैदानावर खेळणारा कोलकाता नाइट रायडर्स संघ पुरता भेदरला होता. सुनील नरिन (४), ख्रिस लिन (१८), रॉबिन उथप्पा (३) आणि नितीश राणा (३) हे दिग्गज फलंदाज माघारी परतल्यामुळे कोलकाताची अवस्था ४ बाद ५१ अशी झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने कर्णधाराला साजेशी खेळी करत कोलकाताला बिकट स्थितीतून बाहेर काढलं.
दिनेश कार्तिक आणि शुभमन गिल यांनी पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचली. कार्तिकची खेळी ५२ धावांवर संपुष्टात आल्यानंतर आंद्रे रस्सेलने तुफानी फलंदाजी करत कोलकाताला मजबूत स्थितीत आणले. त्यानं २५ चेंडूंचा सामना करत ३ चौकार आणि ५ षटकारांची बरसात करत नाबाद ४९ धावा फटकावल्या. त्यामुळे कोलकाताला २० षटकांत ७ बाद १६९ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.
कोलकाताचे १७० धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सनं दमदार सुरुवात केली. राहुल त्रिपाठी आणि अजिंक्य रहाणे यांनी ४७ धावांची सलामी दिली. त्रिपाठी (२०) बाद झाल्यावर रहाणे आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानला विजयासमीप आणून ठेवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भर घातली.
रहाणे आणि सॅमसन हे दिग्गज फलंदाज मैदानावर असताना राजस्थानची अवस्था १ बाद १०९ अशी होती. त्यांना विजयासाठी ३६ चेंडूंत ६१ धावांची आवश्यकता असताना राजस्थान सहजपणे हे उद्दिष्ट गाठेल, असं वाटलं होतं. पण रहाणेपाठोपाठ (४६) सॅमसनही (५०) पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर हेन्रिक्स क्लासेन (नाबाद १८) आणि बाकीच्या फलंदाजांना अपेक्षित विजय मिळवता आला नाही. त्यामुळे राजस्थानला २५ धावांनी हा सामना गमवावा लागला.