इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामाचे सामने यंदा चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु, दिल्ली आणि मुंबई या ६ शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यापैकी मुंबईत प्रेक्षकांविना सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा स्पर्धेच्या आखणीत बदल केला आहे. चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा ५ शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनानं प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे.
हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानांवर खेळता येणार नाही.
यंदाच्या आयपीएलच्या तारखा आणि कार्यक्रमपत्रिका याविषयी प्रशासकीय समितीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएलच्या साखळीत आतापर्यंत प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी २ सामने खेळायचा. त्यामुळे उभय संघांचे सामने दोन्ही संघांच्या गृहमैदानावर व्हायचे. परंतु यंदा प्रवास कमी करण्यासाठी ८ संघांची २ गटांमध्ये विभागणी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात विशिष्ट सामनेच संघांना खेळता येतील.
११ एप्रिलपासून आयपीएल?