श्रीलंकेविरूद्धची कॅण्डी येथील टेस्ट मॅच जिंकून भारताने ही टेस्ट सिरीज 3-0 अशी खिशात घातली आहे. आता 20 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या वनडे सिरीज आणि त्यापुढे ट्वेंटी-20 सिरीजकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र मुंबईकरांसाठी या दौऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तीन मुंबईकर या सिरीजमध्ये खेळणार आहेत. आधीपासून टीममध्ये असलेल्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसोबतच आता वनडे सीरीजसाठी शार्दूल ठाकूर हे मुंबईकर नाव टीममध्ये दाखल झालं आहे.
शार्दूल ठाकूर मुंबईच्या रणजी संघाकडून राईट आर्म फास्ट बॉरल म्हणून खेळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शार्दूलने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला आयपीएलमध्ये आधी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि नंतर सुपरजायन्ट्स पुणे संघाने खरेदी केले.
2012च्या नोव्हेंबर महिन्यात राजस्थानविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तर बडोद्याविरोधात झालेल्या आयपीएल मॅचमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शार्दूलने मुंबईकडून खेळताना एकूण 49 मॅचमध्ये 169 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये तब्बल 11 वेळा त्याने एका मॅचमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शार्दूलला वजनासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं मार्गदर्शन मिळाल्याचं सांगितलं जातं. 2012च्या रणजी मोसमात शार्दूलला त्याच्या वजनामुळे फिटनेसची समस्या जाणवत होती. त्यावेळी शार्दूलचं वजन तब्बल 83 किलो होतं. मात्र 'क्रिकेटमध्ये जर करिअर करायचं असेल, तर फिटनेसवर काम करावं लागेल' असा सल्ला सचिन तेंडुलकरने त्याला दिला होता.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)