भारतीय क्रिकेट संघ आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI)च्या प्रशासकीय समिती (COA)ने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रसारमाध्यम आणि चाहते यांच्याशी नम्रतेने वागण्याची समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान २१ नोव्हेंबरपासून टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ टी २०, ३ वन डे आणि ४ टेस्ट मॅच खेळणार आहे.
काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय फलंजादाजांपेक्षा चांगले खेळतात असं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना संतापलेल्या विराटने त्या चाहत्याला उद्देशून तुला परदेशी खेळाडू आवडत असतील, तर थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. यावरून विराट कोहलीला सोशल मीडियावरून चांगलचं ट्रोल करण्यात आलं. विराटने चाहत्याला असं बोलणं BCCIच्या प्रशासकीय समितीलाही रूचलं नव्हतं.
BCCI चे खजिनदार अनिरूद्ध चौधरी यांनी यावर बोलताना, BCCI ने नेहमीच चाहत्यांचा सन्मान केला आहे. चाहते सोडून गेल्यास कुठल्याही कंपन्या आपल्याला जाहिराती देण्यास पुढे येणार नाहीत आणि तसं झाल्यास BCCI आर्थिक संकटात सापडू शकते. कदाचित खेळाडूंचं मानधनही कापावं लागू शकतं, असं म्हणत विराटला घरचा आहेर दिला होता.
त्यामुळे आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी समितीतील सदस्यांनी विराटशी फोनवरून संपर्क साधत आक्रमकपणा खेळात असावा, पण प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेने वाग, अशी ताकीद दिली आहे. तुझं वर्तन भारतीय कर्णधारपदाला साजेसं असायला हवं, असा सल्लाही समितीने दिला.
समितीनं दिलेला हा सल्ला विराट किती मनावर घेतो, हे आता आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिसून येईलच.
हेही वाचा-
...तर भारतातून निघून जा; विराट कोहलीचा चाहत्याला सल्ला
चाहते सोडून गेल्यास मानधनात कपात, बीसीसीआयचा विराटला घरचा आहेर