भांडुपमधील टँक रोड परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. विजय सुरेश बागडी असं या मुलाचं नाव असून तो भांडुपाच्याच छत्रपती शिवाजी महाराज तलावात आपल्या मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेला होता.
विजय आपल्या मित्रांसोबत तलावात पोहत असताना तलावात कारंजे सुरू होते. त्याचवेळी त्याला विजेचा झटका बसला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी दाखल झाले. होडीच्या मदतीने शोध घेत त्यांनी विजयचा मृतदेह बाहेर काढला.
काही दिवसांमध्ये या तलावात बुडण्याचे आणि आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना सगळीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. याशिवाय हा तलाव खोल असल्याकारणाने यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.