उत्तरप्रदेशमध्ये टोळी वादातून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांना यश आलं आहे. विनोद दुबे असं या आरोपीचे नाव आहे. तो मागील अनेक दिवसांपासून यूपी पोलिसांना चकवा देत होता.
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर परिसरातील भरहलगंज परिसरात मे महिन्यात दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. १५ मे रोजी दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादात रमेश दुबे, विनोद दुबे, मनिष दुबे यांनी दुसऱ्या गटाचे श्यामप्रसाद हरबू यांच्या चुलत भावाची गोळ्या घालून हत्या केली होती. या गुन्ह्यात यूपी पोलिसांनी रमेश आणि मनिषला अटक केली होती. मात्र, विनोद फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी यूपीच्या हत्येतील आरोपी मुंबईत लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा ४ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस विनोदच्या मागावर होते.
विनोद ठाणेच्या मानपाडा परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा ४चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले, पोलिस निरीक्षक नितीन खेडेकर यांच्या पथकाने दुबेला अटक केली. पुढील तपासासाठी पोलिसांनी विनोद दुबेचा ताबा भरहलगंज पोलिसांकडे दिला आहे.
हेही वाचा -
'सुदर्शन चक्रा'नेच केली पानसरे, गौरी लंकेशची हत्या!
एकतर्फी प्रेमातून तरुणीला मिठी मारणारा अटकेत