नालासोपारा शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून पुरोगामी व्यक्तींच्या हत्येचा गुंता उलगडत चालला आहे. आरोपींच्या चौकशीत डाॅ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चौघांना मारण्यासाठी एकाच पिस्तुलाचा वापर केल्याचं आरोपी अमोल काळेच्या चौकशीतून निदर्शनास आलं आहे. या पिस्तुलाला आरोपींनी सुदर्शन चक्र हे नाव दिलं होतं.
राज्यात घातपाताच्या प्रयत्नात असलेल्या ५ जणांची महाराष्ट्र एटीएसने नुकतीच धरपकड केली. त्यांच्या चौकशीतून पुण्यातील सनबर्न या वेस्टर्न म्युझिकल कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न असल्याची कबुली त्यांनी दिली.
पद्मावत चित्रपटाला विरोध, कल्याणच्या भानूसागर आणि बेळगावच्या प्रकाश चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडविल्याची कबुलीही आरोपींनी दिल्याची माहिती सीबीआयतर्फे न्यायालयात देण्यात आली. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या पोलिस कोठडीत ७ दिवसांनी वाढ केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरच्या भटवाडीतून अविनाश पवारला देखील एटीएसने अटक केली होती. कर्नाटक एसआयटीचे अधिकारी शनिवारी मुंबईत या ५ जणांच्या चौकशीसाठी आले होते. मंगळवारी देखील हे अधिकारी पुन्हा आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत अमोल काळे हाच या ४ हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणात राजेश बांगरने शस्त्र आणि वाहन पुरविले असून अमित डेगवेकर हा पैसा पुरवत होता असल्याचे कर्नाटक एसआयटीच्या चौकशीत उघड झाले आहे. परशुराम वाघमारेला अमोल काळेनेच गोळ्या झाडण्यासाठी नेमलं होतं अशी कबुली वाघमारे याने याआधी दिली आहे.
हेही वाचा-
म्हणून पुणे पोलिसांची विविध ठिकाणी छापेमारी
वैभव राऊतसह एटीएसने पडकलेल्या ९ जणांशी संबंध नाही, सनातन संस्थेचा खुलासा