वैभव राऊतसह एटीएसने पडकलेल्या ९ जणांशी संबंध नाही, सनातन संस्थेचा खुलासा

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले. याचसोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सनातन संस्थेची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचाही आरोप केला.

वैभव राऊतसह एटीएसने पडकलेल्या ९ जणांशी संबंध नाही, सनातन संस्थेचा खुलासा
SHARES

नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने पकडलेला आरोपी वैभव राऊत याच्यासह ९ जणांशी कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा सनातन संस्थेने सोमवारी केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी संस्थेवरील सर्व आरोप फेटाळून लावले. याचसोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सनातन संस्थेची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचाही आरोप केला. याप्रकरणी लवकरच न्यायालयीन प्रक्रिया करण्याची माहिती त्यांनी दिली.


काय म्हणाले राजहंस?

नालासोपारा शस्त्रास्त्र प्रकरणात अटकेत असलेल्या ९ आरोपींची सध्या एटीएसकडून चौकशी सुरू आहे. सोबतच डाॅ. दाभोलकर प्रकरणाचीही सीबीआय चौकशी सुरू आहे. या चौकशीत कुठल्याही आरोपीने आमचा सनातन संस्थेशी संबंध असल्याचं सांगितलेलं नाही. कुठल्याही आरोपपत्रात सनातन संस्थेचं नाव नाही किंवा एफआयआरमध्ये साधा उल्लेखही नाही. तरीही माध्यमांमध्ये या सर्व प्रकरणांशी सनातन संस्थेचं नाव सूत्रांच्या हवाल्याने अगदी उघडपणे जोडलं जात आहे. जे पूर्णपणे चुकीचं आहे. हा एकप्रकारे आमच्यावर होणारा अन्याय आहे, असं राजहंस म्हणाले.


हिंदुत्वाच्या कामावर टीका का?

आम्ही मागच्या २७ वर्षांपासून हिंदुत्व आणि अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. आमचे हजारो साधक आणि लाखो अनुयायी आहेत. या सर्वांना खोट्या प्रचाराचा त्रास होत आहे. आजवर आमच्या कुठल्याही कार्याने समाजात दंगा वा हिंसा पसरलेली नाही, आमच्या कुठल्याही कार्याने देशाच्या सुरक्षेला बाधा पोहोचलेली नाही. आम्ही जे भ्रष्टाचार बाहेर काढले मग ते लोकांविरोधातील असो, मंदिर वा संस्थेविरोधातील असो ते सर्व जनहित याचिका किंवा माहिती आधाराच्या कायद्याचा वापर करून बाहेर काढले आहेत. मग आमच्यावर ही टीका का केली जात आहे? असा प्रश्नही राजहंस यांनी उपस्थित केला.



बंदीची मागणी कशाच्या आधारे?

सन २००८ मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेला स्फोट, २००९ मध्ये मडगावमध्ये झालेला स्फोट, डाॅ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यानंतर नालासोपारा येथील शस्त्रास्त्र प्रकरणात कुठल्याही पुराव्याशिवाय सनातनवर आरोप केले जात आहेत. विरोधांकडून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. एटीएसने आरोपींच्या केलेल्या चौकशीत आमचं नाव आलं नसल्याचं सांगितलेलं असताना, राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी संस्थेचं नावं कुठेही आलेलं नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं असताना बंदीची मागणी कशाच्या आधारे केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


अंनिसचं षडयंत्र

सनातन संस्थेला मराठा आंदोलनात स्फोट करायचा होता, बकरी ईदमध्ये स्फोट करायचा होता, असं म्हणत सूत्रांच्या आधारे चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. सोशल मीडियावरून बदनामी केली जात आहे. यामागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा हात आहे. पोलिस देखील आमच्या साधकांना चौकशीसाठी ताब्यात घेत आहेत. हे सर्व आमच्याविरोधातील षडयंत्र असून याविरोधात आम्ही न्यायालयीन कारवाई करणार आहोत, असंही राजहंस यांनी जाहीर केलं.



हेही वाचा-

आता तरी सनातन संस्थेवर बंदी येणार का?

'सनातन'वर बंदी घालण्याचं काम सुरू- केसरकर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा