नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळकर आणि शरद कळसकर या तिघांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने अटक केली होती. या प्रकरणी तिघांना शनिवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने तिघांना आणखी १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्या. विनोद पाडळकर यांनी तिघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नालासोपाऱ्यासह, पुणे, सातारा, सोलापूरमध्ये देशी बाॅम्बच्या सहाय्याने घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना महाराष्ट्र एटीएसने ९ आॅगस्ट रोजी रात्री अटक केली होती.
या तिन्ही आरोपींना संपूर्ण प्रकरणाच्या दाहकतेची कल्पना असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि इतर साहित्य या तिघांकडे कसं आलं? याप्रकरणाचे इतर धागेदोरे तपासण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचं निरीक्षण न्यायालयानं व्यक्त केलं.
सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातून गावठी पिस्तूल, गोळ्या, पुण्यातील पर्वती इथून काही सीसीटिव्ही फुटेज, ३ गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि सुधन्वा गोंधळेकरच्या ऑफिसमधून अक्षेपार्ह लिखाण साहित्य हस्तगत करण्यात आल्याचं यावेळी न्यायालयाला सांगण्यात आलं.
दरम्यान वैभव राऊतच्या समर्थनासाठी नालासोपाऱ्यातील हिंदूत्ववादी समर्थक शनिवारी दुपारी रस्त्यावर उतरले होते.
हेही वाचा-
कोण आहे कट्टर हिंदुत्ववादी वैभव राऊत?
वैभवच्या ट्विटर अकाऊंटहूनही संशयास्पद संदेश