१४ जणांचे प्राण घेणाऱ्या कमला मिल आग दुर्घटनेतील पाच प्रमुख आरोपींची ३१ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या पाचही जणांना भायखळ्याच्या आर्थररोड कारागृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कमला मिल कंपाऊंडमध्ये 29 डिसेंबर रोजी मोजोस बिस्त्रो आणि वनअबव्ह पबला लागलेल्या आगीनंतर दोन्ही पबच्या मालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. या गुन्ह्यात आतापर्यंत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये मोजोस बिस्त्रो पबचे युग पाठक आणि युग तुली यांचा समावेश आहे. तर वन अबव्हच्या क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर यांना 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
या पाच जणांना बुधवारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकिलांनी अन्य आरोपींचा सहभाग आणि पुरावे मिळणे बाकी असल्याचे सांगत वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी 'या पूर्वीच आरोपींनी पोलिसांना सर्व सहकार्य करत माहिती दिली असून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी' करत, जामीन मिळण्याबाबत अर्ज केला. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना 31 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत, 'जामिनासंदर्भातील सुनावणी 22 जानेवारी रोजी करण्यात येईल' असे सांगितले. त्यानुसार या पाचही जणांना भायखळ्याच्या आर्थर रोड कारागृहात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा