गेल्या काही वर्षांत उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश अाणि उत्तर प्रदेशातील काही भागातून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे हे बंदर अाता संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडलं आहे. नुकतीच महसूल गुप्तवार्ता विभाग अर्थात 'डीआरआय'ने केलेल्या कारवाईत दोन कंटेनरमधून ७.१२० मेट्रिक टन रक्तचंदन हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे, मक्याच्या कणसाच्या पिशव्यांमधून या रक्तचंदनाची तस्करी केली जात होती. या रक्तचंदनाची किंमत तब्बल २.८५ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली अाहे. त्यांनी दुबईत मक्याची कणसे निर्यात करत असल्याचे भासवून ही तस्करी केल्याचे समोर आले आहे.
पश्चिम उपनगरात राहणाऱ्या या चारही आरोपींना यापूर्वी डीआरआयने सिगारेट तस्करीप्रकरणी अटक केली होती. सुजत बापू साटम, गयाप्रसाद चौधरी, कमलेश घोगले आणि रोहन अवसारे अशी या आरोपींची नावे आहेत. साटम हा या टोळीचा मुख्य आरोपी असून गयाप्रसाद चौधरीने ही रक्तचंदनाची लाकडं मनोरी ते न्हावा शेवापर्यंत आणल्याचं तपासात पुढे आलं आहे. दुबईला मक्याची कणसं पाठवण्याच्या नावाखाली या आरोपींनी मक्याच्या कणसाच्या गोणीत ही रक्तचंदनाची लाकडं लपवली होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधून ही रक्तचंदनाची लाकडं अनधिकृतरित्या तोडून आणली होती. सेंट्रल विभागानं हा कंटेनर तपासला होता. त्यात मक्याची कणसं पाहिल्यानंतर त्या कंटेनरला सीलही ठोकलं होते. मात्र आरोपींनी हे सील तोडून त्यामधील मक्याची कणसं काढून रक्तचंदनाची लाकडं भरली. सील तोडल्याचं लक्षात अाल्यानंतर ही चोरी उघडकीस अाली. यापूर्वी या तस्करीचा मास्टरमाईंड सुजत साटमला पोलिसांनी रक्तचंदन तस्करीप्रकरणी २००६ मध्ये अाणि सिगारेट तस्करीप्रकरणी २००१ मध्ये अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून इतर तस्करीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.