मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत होत असतानाच दुसरीकडं रेल्वे हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाल्याची माहिती समोर आहे. एप्रिल ते नोव्हेंबपर्यंत विविध ५०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसंच, यामध्ये सर्वाधिक चोऱ्या, दरोडा आणि त्यापाठोपाठ विनयभंग, खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे घडले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तर वाढ अधिक असून जवळपास १९८ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गावर सध्याच्या घडीला १२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून त्यांच्यासाठी ९० टक्क्यांहून अधिक लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पाच चोरी आणि हल्ला, मारहाणीची एक अशा एकूण ६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मे महिन्यात विविध ९ गुन्हे दाखल झाले. तर जूून महिन्यात दुप्पट आणि जुलै महिन्यात ३७ गुन्हे दाखल झाले. त्यानंतर गुन्ह्यांची वाढ होत गेली. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीत, गेल्या आठ महिन्यांत विविध ५०० गुन्ह्यांची नोंद होतानाच यातील १३७ गुन्ह्यांची यशस्वीरीत्या तपास करण्यात आला आहे.
घडलेल्या गुन्ह्यांची मोबाइल, पाकीट, चैन, बॅग यांसह विविध चोरीचे एकूण ३६५, त्यानंतर मुंबई हद्दीत दरोड्याचे ८२ गुन्हे आहेत. मुंबई उपनगरीय लोकलमधून अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि सर्वच महिलांना लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांना प्रवेश देण्यासाठी लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, तिकीट तपासणीस विविध स्थानकांत तैनात असतात.
कारवाई
महिना | दाखल गुन्हे | यशस्वी तपास |
एप्रिल | ६ | १ |
मे | ९ | १ |
जून | १८ | १ |
जुलै | ३७ | ५ |
ऑगस्ट | ५८ | १९ |
सप्टेंबर | ६३ | १९ |
ऑक्टोबर | १११ | ३८ |
नव्हेंबर | १९८ | ५३ |