भिवंडीमधील अवचित पाडा परिसरातील रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये अडकून वडिल आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चंद्रकांत जयराम राठोड (४५) आणि रमेश चंद्रकांत राठोड (२१) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही भिवंडीतील केजीएन तबेल्यामध्ये कामगार म्हणून काम करत होते. तबेल्यासमोरील ड्रेनेजमधून पाणी का येत नाही? हे पाहण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरल्यावर दोघांचाही या पाण्यात बडून मृत्यू झाला.
शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आणि रमेश हे अवचित पाडा येथील केजीएन नावाच्या तबेल्यात काम करत होते. तबेल्यातील म्हशी धुण्यासाठी आणि तबेलाच्या वापरासाठी ते तबेल्यासमोरील ड्रेनेज लाईनमधून पाणी काढायचे. यासाठी त्यांनी ड्रेनेज लाईनवर मोटर देखील बसवली होती.
परंतु, शुक्रवारी सकाळी ड्रेनेजमधून पाणी येत नसल्यामुळं मोटारीत काही बिघाड झाला आहे का? हे पाहण्यासाठी रमेश ड्रेनेजमध्ये उतरला. तो बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून चंद्रकांत राठोड त्याला शोधण्यासाठी ड्रेनेजमध्ये उतरले. मात्र ते देखील ड्रेनेज लाईनमध्ये अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रकांत आणि रमेश ड्रेनेजमध्ये अडकल्याची माहिती मिळताच तेथील कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना दोघांनाही बाहेर काढता आलं नाही. त्यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांना बाहेर काढलं. त्यानंतर लगेचच उपचारासाठी जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
हेही वाचा-
फेसबुकवरील मैत्री महिलेला पडली महागात; साडेचार लाख उकळले
गुंतवणूकदारांना गंडवणारा गजाआड