महाराष्ट्र पोलिस दलाच्या भरतीसाठी मुंबईत आलेल्या चार मैत्रिणींचा गंभीर अपघात झाल्याची घटना विक्रोळीत घडली आहे. या चौघी पुण्याहून भरतीसाठी आल्या होत्या.
चैताली दोरगे आणि तिच्या तीन मैत्रिणी पुण्यावरून मुंबईत, विक्रोळीत पोलिस भरतीसाठी आल्या होत्या. धावण्याची चाचणी पूर्ण करून सकाळी अकराच्या सुमारास विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावरील घोडा गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडत होत्या. मात्र तेवढ्यात एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात त्या चौघी जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या चौघींना उपचारांसाठी शीव रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धावण्याची चाचणी पूर्ण करून विक्रोळी स्थानकाच्या दिशेने या चौघी निघाल्या होत्या. त्यावेळी एमएच ०४ जेके ३२६१ या क्रमांकाची कार भरधाव वेगानं आली नि या कारच्या धडकेत या चौघी जखमी झाल्या. चार पैकी एक गंभीर जखमी झाली असून एकीच्या डोळ्याला जबर मारला लागला आहे. तर दोघींना किरकोळ मार लागल्याचं शीव रूग्णालायतील सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कारचालकास अटक करण्यात आली असून याप्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गंभीर झालेल्या चार मैत्रीणींपैकी तिघींची नावं समजली असून एकीचं नाव अद्याप समजलेलं नाही. चैताली, दिपाली आणि काजल अशी या तिघींची नावं आहेत.
हेही वाचा
हाय हिल्स सॅण्डल्समुळे ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू