Exclusive मुंबई पोलिस दलात दाखल होणार ६ नव्या 'ट्राँलर' बोटी

स्पीड बोटींची क्षमता कमी झाल्यामुळे समुद्रात गस्त घालताना पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ६ नव्या हायस्पीड आणि अत्याधुनिक ट्राँलर बोटींची मागणी राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. या मागणीला मंजूरी मिळाली असून लवकरच ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर मुंबई पोलिस दलात या बोटी दाखल होणार आहे.

Exclusive मुंबई पोलिस दलात दाखल होणार ६ नव्या 'ट्राँलर' बोटी
SHARES

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समुद्र सुरक्षेसाठी २००९ मध्ये १४ सी लेक बोटी न्यूझीलंडहून मागवल्या होत्या.  या बोटींना आता १० वर्ष पूर्ण झाली. त्याच बरोबर त्या क्षमतेने ही पाण्यात या बोटींच्या मदतीने काम करणे अवघड जात असल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी ६ नव्या हायस्पीड आणि अत्याधुनिक ट्राँलर बोटींची मागणी राज्य सरकारकडे काही महिन्यांपूर्वी केली होती. या मागणीला मंजूरी मिळाली असून लवकरच ६ महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर मुंबई पोलिस दलात या बोटी दाखल होणार आहे. 


जुन्या ‘स्पीड बोटीं’ची क्षमता

२६/११ च्या वेळी मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतरही गेल्या आठ वर्षांत सागरी सुरक्षेत फारशी प्रगती झालेली नाही. मुंबईसह राज्याला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय. पण या सागरी किनार्‍यांची सुरक्षा करण्याकरता फक्त २१ सागरी पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी ५ मुंबई ५ ठाणे ग्रामीण, ५ रायगड जिल्हा, ६ सिंधुदर्ग, ५ रत्नागिरी जिल्ह्यात तर ३६ कोस्टल चौक्या, २२ नौका आणि ७ स्पीड बोटी आहेत. पण एवढा जथ्था असला तरी त्यातील बहुतेक साधनंही जुनी आणि नादुरुस्तच आहेत. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्यानंतर २००९ मध्ये मुंबई पोलिसांना 'फास्ट पेट्रोलिंग सर्व्हिस' १४ स्पीड बोटी देण्यात आल्या होत्या. या बोटींद्वारे पोलिस हे समुद्रात गस्त घालत होते. मात्र कालांतराने या बोटींची क्षमता कमी असल्यामुळे गस्त घालण्यात अडचणी येऊ लागल्या. या बोटी ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने पाण्यात जरी धावू शकत असल्या, तरी ५ नाँटीकल अंतरापेक्षा त्या खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या, उथळ समुद्रात या बोटी पाण्यात थांबू शकत नाहीत. तसेच ४ ते ५ तासाच्यावर त्या पाण्यात थांबू शकत नव्हत्या, त्यातच १० पेक्षा जास्त मनुष्यबळ नेहता येत नव्हते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊऩ समुद्री सुरक्षा अधिक बळकट बनवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यसरकारकडे नवीन आणि अत्याधुनिक ट्राँलर बोटींची मागणी केली होती. 


नव्याने दाखल होणाऱ्या ‘ट्राँलर बोटीं’ची क्षमता  

 मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या नियुक्तीची घोषणा होऊन पाच तास उलटत नाही. तोच मुंबईच्या समुद्र सुरक्षा बळकटीकरणासाठी त्यांनी या बोटींसाठी लागणारा २.७५ कोटींचा निधी मंजूक करून घेण्यात आला आहे. या नव्या अत्याधुनिक ट्राँलर बोटीं या सहा महिन्यासाठी भाडेतत्वावर नामकिंत कंपनीकडून घेण्यात येणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या या एका बोटीचे दिवसाचे भाडे हे १५ हजार असणार असून सहा बोटींसाठी दिवसाला ९० हजार रुपयांचा खर्च येणार आहे.  त्यासाठी विविध कंपन्यांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या बोटीद्वारे खोल समुद्रकात ८ ते १२  नाॅटीकल माईल खोल समुद्रात गस्त घालणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून या बोटीवर एकाच वेळी १६ जण प्रवास करू शकतात. मात्र समुद्रात फक्त २ तास ही बोट थांबू शकते. या बोटींचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात येईल. त्या कंपनीच्या मालकावर, ठेकेदारावर कुठल्याही गुन्ह्यांची नोंद नसावा, तसेच या बोटीवर चालक, सहाय्यक कंपनीचा असावा, कुठलीही बोट बिघडल्यास तात्काळ दुसरीबोट गस्तीसाठी कंपनीने द्यावी,  तसेत कंपनीने बोटीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्याची अट पोलिसांकडून कंत्राट मिळणाऱ्या कंपन्यांना घातली आहे. पावसाळ्यात मात्र या बोटींद्वारे पोलिसांना गस्त घालता येणार नाही आहे. 


अशी घातली जाणार ६ बोटींद्वारे गस्त

मुंबईच्या समुद्रात या सहा बोटी तीन टप्यात गस्त घालणार आहे. पहिल्या टप्यात कफपरेड ते माहुल ते गाव या समुद्र किनाऱ्यावर २ बोटी गस्त घालणार आहेत. तर मरीनड्राव्ह-राजभवन वांद्रे दरम्यान २ बोटी गस्तीला ठेवण्यात येणार आहेत. तर  वांद्रे-जुहू ते गोराई दरम्यान २ बोटी गस्तीला ठेवण्यात येणार आहे. या शिवाय इतर अत्याधुनिक १४ बोटी ही गस्त घालणार आहेत.  


'इमिजेट सपोर्ट व्हेकल' बोटी ही लवकच दाखल

या नव्या अत्याधुनिक ('इमिजेट सपोर्ट व्हेकल') बोटी 'राॅयल इन्स्टीट्युशन आॅफ नेव्हल आर्चीट' या कंपनीकडून येणार आहे. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. या बोटीद्वारे २०० नाॅटीकल माईल खोल समुद्रात गस्त घालणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर ताशी २५ किलोमीटर वेगाने ही बोट धावणार असून या बोटवर एकाच वेळी ३४ जण प्रवास करू शकतात. तसेच समुद्रात सात दिवस ही बोट थांबू शकते. सध्या ही बोट ओएनजेसी आणि नेव्हीच्या अधिकाऱ्यांकडे आहे. ओएनजेसीने ही बोट पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतली असून त्याचे दिवसाचे भाडे १ लाख ७० हजार इतके आहे. या बोटी लवकरच महाराष्ट्र पोलिस दलाला मिळणार असून त्यामुळे समुद्री सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.    


समुद्र सुरक्षेच्या बळकटीकरणासाठी ट्राँलर बोटींना शासनाने मंजुरी देण्यात आली असून लवकरच या बोटी मुंबई पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर मागोमाग ‘इमिजेच सपोर्ट व्हेकल’ बोटींच्या प्रस्तावाला ही मंजुरी मिळाल्याने मुंबईची समुद्र सुरक्षा अधिक बळकट होईल.

निशित मिश्रा,  दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त

हेही वाचा

शिवडीत पोलिसांनी पकडली १२ लाखांची संशयीत रक्कम


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा