एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी दया नायक यांची मुंबई एटीएसमधून गोंदिया येथे बदली करण्यात आली होती. या बदलीला आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दया नायक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ६ मे रोजी दया नायक यांच्या बदलीचा आदेश काढला होता. त्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचं सांगण्यात आलं होतं. नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून थेट गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात रवानगी करण्यात आली होती. या बदलीला दया नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिलं होतं. त्यानंतर मॅटचे न्यायिक सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांनी सुनावणीमध्ये या बदलीला तात्पुरती स्थगिती देत पोलीस मुख्यालयाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे.
दया नायक यांनी अॅड. मकरंद लोणकर यांच्यामार्फत अर्ज दाखल करून बदली आदेशाला आव्हान दिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, पूर्वी माझी बदली मुंबईतून नागपूर विभागात करण्यात आली होती. त्यावेळी मला व माझ्या कुटुंबीयांना अंडरवर्ल्डमधील गुंड व दहशतवाद्यांकडून धोका असल्याची भीती व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे बदली आदेश रद्द केला होता.
पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून मी एटीएस मध्ये कार्यरत आहे. माझ्या सेवेविषयी कोणतीही तक्रार नसताना ६ मे २०२१ रोजी अचानक माझी बदली मुंबईतून गोंदियामध्ये करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यासाठी प्रशासकीय कारण देण्यात आले. मात्र, माझा सेवेचा सर्वसाधारण काळ पूर्ण झाला नसताना, नियमित बदलीसाठी माझे नाव नसताना आणि मला व माझ्या कुटुंबीयाला धोका असतानाही मुंबईतून नागपूर विभागात बदलीचा आदेश काढण्यात आला आहे.
दया नायक यांच्या अर्जावर राज्य सरकारची बाजू मुख्य सरकारी वकील स्वाती मणचेकर यांनी मांडली. तर नायक यांच्यावतीने अॅड. मकरंद लोणकर यांनी युक्तिवाद केला. न्या. कुऱ्हेकर यांनी लोणकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत बदली आदेशाला स्थगिती दिली.
हेही वाचा -